आक्कीतीचं आळं,

बेंदराला खावी फळं!

महाराष्ट्रात परंपरागत आंबे खाण्यास सुरू करण्याचा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश घरात आमरस आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. मराठी वैशाख महिन्याचा तिसरा दिवस, अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. यावेळी शेतशिवारात चारोळी पिकलेली असतात. तोरणं पिकून संपत आलेली असतात. करवंदं नुकतीच पिकायला सुरुवात झालेली असतात. आंब्याखाली पाड पडण्यास सुरुवात होतात. वैशाख उन्हाची झळ कमी करण्यासाठी हा सर्व रानमेवा सोबतीला असतो. याच महिन्यात उसाचा रस मोठ्या प्रमाणात प्यायला जातो. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याबरोबरच वस्तू, अन्न, बी-बियाणे दान केले जातात. असा हा अक्षय्य तृतीया कृषीसंस्कृतीमधील महत्त्वाचा सण आहे.

– बसवंत विठाबाई बाबाराव

विदर्भ आणि खान्देशात आखिजी
अक्षय्य तृतीया ही विदर्भ आणि खान्देशात अखातीज किंवा आखिजी म्हणून साजरा केला जातो. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात यालाच अकिती म्हटले जाते. शहरी भागात या दिवशी सोने, नवीन गोष्टी खरेदी केली जातात. गुजराती लोकं यालाच अखातरी म्हणतात. प्रदेशनिहाय नावे जशी वेगवेगळी आहेत, तशीच त्या-त्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. मात्र आमरस आणि पुरण पोळी हे बहुतांश ठिकाणी बनवला जातो. या दिवशी पितरांना पुजले जाते. खान्देशात मुलींना माहेरी बोलावून आणून त्यांचे लाड केले जातात. चांगलं जेवण बनवून खायला घातले जाते. झोका बांधून दिला जातो. गाणी म्हणत झोका झुलवला जातो. भंडारा जिल्ह्यातील जिया चावरे हिने सांगितले, की हा सन त्यांना दिवाळीपेक्षा मोठा आणि महत्वाचा असतो. कुमुदिनी पंचभाई यांनी त्यांच्या अखिजीची आठवण सांगितली. माहेरी आलेल्या मुलींना झोक्यावर बसवून गाणी म्हटली जातात त्यातील एक गाणं त्यांनी म्हणून दाखवलं.
“आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं,
कसाना बाजार वं”
अकोले तालुक्यातील विजया पाडेकर ही तिच्या आईकडून अक्षय्य तृतीयेबद्दल समजून घेत होती. विजयाचे आईने अक्षय तृतीयाच्या त्यांचा जुन्या आठवणी सांगितल्या. “आई-बाबा पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतीत नाही, पण घरापुढे किंवा बाजूला छोटीशी परसबाग करायचे. त्यात घोसाळे, दोडके, घेवडा, कारली अशा वेलवर्गीय भाज्या लावत. त्यासाठी पाणी डोक्यावर दूरवरून आणत आणि घरातील सांडपाणीपण टाकत असत. या दिवशी लावलेल्या वेलींना उत्पादनही चांगले येते. या परसबागेलाच आळण असे म्हणत.”

आटपाडी परिसरात बी-बियाणांची पूजा
सांगली जिल्ह्यातील आटपाडी परिसरात काही शेतकरी याच दिवशी बी-बियाणे यांची पूजा करतात, पूर्वी सर्वांच्या घरी हे केलं जायचं, अशी माहिती शेती परिवार कल्याण संस्थेचे कार्यकर्ते संजय शेंडगे यांनी सांगितली. त्यांच्या आठवणीनुसार या दिवशी ‘होंडी’ ह्या ज्वारीची पेरणी केली जायची. जालन्यातील दत्ता वाडेकर यांनी गावातील जाणकार महिलांशी बोलतांना कळले, की अक्षय तृतीया या दिवशी घरातील सर्व पेरणीसाठीचे बियाणे नीट करून ठेवले जायचे. त्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी घराच्या जवळच्या परसबागेत थोडे थोडे बियाणे लावले जायचे. यामधून जे चांगले उगवून आले, अशाच बियाणाची निवड शेतीत पेरण्यासाठी केला जात असे. सध्या ही प्रथा खूपच कमी लोकं पाळतात.

शेतीच्या कामांना प्रारंभ

अक्षय्य म्हणजे, नष्ट न होणारे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घेतलेली गोष्ट वाढत वाढत जाते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त, त्रेतायुग आणि कृतयुगाची सुरुवात. अशी या दिवसाची महती पुरणाच्या आधारे सांगितले जाते. मात्र शेतकरी समुदायासाठी हा सण शेतीकामासाठी योग्य वेळ मानला जातो. शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शेतीच्या कामांना प्रारंभ करतात म्हणून या सणाला ‘आखेती’ असेही म्हणतात. या दिवशी बी बियाणे नीटनेटके केले जाते. शेतीत नांगरणी केली जाते. बागायती शेती असेल तर आळं केलं जाते. म्हणून अनेक भागात अशी म्हण प्रचलित आहे की, ‘अकितीला आळं तर बेन्द्राला फळं’. ह्या दिवशी जर बियाणं पेरलं, तर जूनमध्ये येणाऱ्या बेंदूर सणापर्यंतफळधारणा होते. उंदड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो. ग्रामीण भागात बलुते-अलुते यावर आधारित गावगाडा सुरू होता, तेव्हा बलुतं म्हणजे धान्य याच दिवशी दिली जायची. शेती आणि शेती औजारशी निगडीत समूहांना शेतकरी त्यांच्या कामाचा मोबदला धान्य रुपात या दिवशी दिला जायचा. भगिरथ राजाने अक्षय्य तृतीया याच दिवशी गंगा पृथ्वीवर आणल्याची गोष्ट सांगितली जाते. म्हणजे कधीकाळी पावसाची सुरुवात या महिन्यामध्ये होत असण्याची शक्यता आहे.
बियाणं उगवण क्षमतेचा अभ्यास
अक्षय्य तृतीया सणानिमित्त येत्या वर्षात शेतीत कोणती पिकं घ्यायची आहेत, त्यापैकी कोण-कोणतं बियाणं घरात उपलब्ध आहे, याचा अंदाज घ्यावा. मोठ्या प्रमाणात पेरलं जाणारं बियाणं हे खात्रीशीर असणे खूप महत्वाचे असते. दुबार पेरणी ही शेतकऱ्यांना खूप महागात पडणारी गोष्ट आहे. शेतीत घातलेल्या बियाणांचं नुकसान तर होणारच, याहून महत्त्वाचं म्हणजे पेरणीचा हंगाम निघून जातो. यामुळे जी बियाणं शेतीत पेरायचं आहे, त्यातील शंभर दाणे एका गोणपाटावर ओळीने मांडत त्याची गुंडाळी करावी. असे शंभर बी झाल्यावर गोणपाटाची गुंडाळी पाण्याने भिजवून ठेऊन द्यावे. बियाणे प्रकारानुसार ही गुंडाळी तीन ते आठ दिवसांनी उघडून बघावी. तोपर्यंत त्यावर रोज थोडे थोडे पाणी शिंपडत राहावे. मट, मूग, चवळी, असे कडधान्य तीन दिवसात अंकुरतात. साळी, गहू, यांना आठवडाभर लागू शकतो. आपल्या अंदाजानुसार बियाणानुसार गोणपाटाची गुंडाळी उघडावी. त्यातील अंकुरलेल्या बियांची संख्या मोजून पहावी. शंभरमधील नव्वदहून अधिक बियाणे उगवले असतील, तर ते बियाणे शेतीत पेरण्यायोग्य आहे असे समजावे. अशाच बियाणाची निवड करून ठेवावी.

ही तपासणी दुकानातून विकत आणलेल्या बियाणांचीही करता येते. बियाणे कंपनी आपल्या पाकिटावर त्यातील बियाणाची उगवण टक्केवारी दिलेली असते. आपण घरी केलेल्या बियाणे तपासणीमध्ये जर पाकिटावर दिलेल्या टक्केवारी पेक्षा कमी टक्के बियाणे अंकुरल्याचे आढळून आल्यास, संबंधित बियाणे कंपनी विरोधात कायदेशीर कारवाही सुद्धा करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबद्दल जागरूक व्हायला हवं. उगवण क्षमता तपासण्यासाठी सध्या बाजारात जेर्मिनेशन पेपरदेखील उपलब्ध आहेत. एका पेपरची किंमत चार रुपये याप्रमाणे त्याचे दर आहेत. एक कागद तीन चार वेळा वापरता येतो. उगवणक्षमता तपासणी हे या विकतच्या कागदातच केलं पाहिजे असं काही नाही. साधं कापड, वृत्तपत्राच्या रद्दीतही ही तपासणी करता येते. नाहीतर वृत्तपत्र कोणत्या कामी येणार? अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर आपल्या शेती संस्कृतीचा महत्वाचा सण म्हणून ही बियाणं तपासण्याची प्रथा पुन्हा सुरू करायला हवं. असे निरीक्षण, नोंदी, अभ्यास होऊ लागला, तर कदाचित शेतीला चांगले दिवस येतील.

मिश्र पाट्याचं बियाणं
पाटा म्हणजे शेतीत पेरलेल्या ओळी. मिश्र पाटा म्हणजे अनेक प्रकारची धान्य एकत्र करून पेरलेल्या ओळी. असा मिश्र पाटा पाटा आता आपल्या शेतीतून हद्दपार होत आहेत. या पाट्याचे अनेकार्थाने महत्त्व आहे. त्याबद्ल सविस्तर पुढील लेखात वाचू शकाल. मात्र या पाट्यात पेरता येतील अशी बियांची जमवाजमव करून ठेवणे गरजेचे आहे. एकदा का मृगाचा पाऊस सुरु झाला की मग बियाणे मिळणे कठीण जाते. पेरणीचे दिवस यासाठी टाळून चालणार नाहीत. त्यासाठी पुढील वीस प्रकारच्या बियाणे जमवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. १. मका, २. मऊ ज्वारी, ३. बाजरी, ४. चवळी, ५. भेंडी, ६. काकडी, ७. शेलनी (काकडीवर्गीय एक प्रकार), ८. वाळूक, ९. दोडका, १०. पारस दोडका (गिलके/चोपड/घोसावळे), ११. दुधी भोपळा, १२. कारले, १३. भादली(तृणधान्य), १४. राळा, १५. गोल्या (ज्वारी), १६. गुंजावाळी (ज्वारी), १६. तूर, १७. मुग, १८. उडीद, १९. कारळा, २०. तीळ, २१. अंबाडी.

फळं हवी असती तर आळं करा
परसबागेत, गॅलरीत, गच्चीवर, कुंड्यांमध्ये जिथे शक्य होईल तिथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दोडका, घोसावळी, डांगर, भोपळा, कारली, वाल, घेवडा अशा वेलवर्गीय बियाणांची लागवड करावी. घरातील सांडपाणी, भाजीपाला आणि तांदूळ धुतलेलं पाणी टाकून ह्या वेली वाढवत राहावं. जूनमध्ये येणाऱ्या बेंदुरापर्यंत या वेली फळांनी लगडलेल्या असतील.
(लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *