मुंबई : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या ७२५ व्या वर्षानिमित्त आळंदीत त्यांच्या समाधीशेजारी असणाऱ्या पवित्र अजानवृक्षाची लागवड मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली.

पर्यावरण व जैवविविधता अध्ययन, संरक्षण व संवर्धन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘बायोस्फिअर्स’ या संस्थेतर्फे वृक्षारोपण तसेच पर्यावरण रक्षणासंबंधी संबंधी माहिती पत्रकांच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन राजभवनावर करण्यात आले होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते अजानवृक्ष, सुवर्ण पिंपळ आणि शमी या वृक्षांची शास्त्रीय माहिती देणाऱ्या माहितीपत्रांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच आळंदी येथील सुवर्ण पिंपळाचा बीज प्रसाद देखील उपस्थित लोकांना देण्यात आला. कार्यक्रमस्थळी जलसंवर्धन आणि जलसाक्षरता या विषयावरील लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

यावेळी राज्यपाल म्हणाले, भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली, तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. तसेच स्थान संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीजवळ असलेल्या अजानवृक्षाचे आहे. आपल्या देशात तुळशीपासून तर वटवृक्षापर्यंत प्रत्येक झाडाला सांस्कृतिक महत्व आहे. वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ होऊन त्याद्वारे पर्यावरण रक्षणाचे कार्य केले जावे, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.

तसेच, आपल्या देशात प्रत्येक झाडाचे सांस्कृतिक महत्व जाणून पूजा केली जात असे. यामागे शास्त्रशुद्ध चिंतन आणि दूरगामी विचार होता. परकीय आक्रमणाच्या काळात शास्त्रीय विचार मागे पडून केवळ रुढी उरल्या. त्यामुळे प्रत्येक झाडाचे शास्त्रीय महत्व समजून त्याचे वृक्षारोपण केले जावे, अशी अपेक्षाही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

सिद्धवृक्ष, गोरक्षवल्ली, शांभवी, योगवल्ली आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अजानवृक्षाचे राजभवन येथे रोपण केल्यामुळे त्याला राजाश्रय मिळाला आहे, असे बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक व पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये अजानवृक्षाचे रोपण व्हावे आणि त्या माध्यमातून नवी पिढी पर्यावरणाबाबत जागरूक व्हावी अशी अपेक्षाही डॉ. पुणेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधीशेजारी असलेला अजानवृक्ष सर्वदूर पोहचवणे, तसेच त्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने बायोस्फिअर्स ही संस्था ‘माऊली हरित अभियान’ या अंतर्गत कार्य करीत असल्याची माहिती पुणेकर यांनी कार्यक्रमात दिली.

कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढा, ह. भ. प. माणिक महाराज मोरे, डॉ. रवींद्र जायभाये, डॉ. मोहन वामन, डॉ. शंकर लावरे, सुरेश वैद्य, शिवलिंग ढवलेश्वर, दिपक हरणे, दत्तात्रय गायकवाड, आशिष तिवारी, जय जगताप, पराग शिळीमकर, सुनील जंगम, समीर घोडेकर, चंद्रकांत सहासाने, अतुल सलागरे, शाहू सावंत, सुप्रिया पुणेकर, जान्हवी जगताप, निवेदिता जोशी, ईश्वरी जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. लावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, डॉ. जायभाये यांनी आभार मानले. डॉ. पुणेकर यांनी प्रास्ताविक केले, तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *