श्रावण महिना सणांचा;
बंधुभाव अन् एकोप्याचा…

रिमझिम पावसात, प्रसन्न हिरवाईनं नटलेल्या वातावरणात येणाऱ्या श्रावण महिन्यात हिंदु धर्मातील सर्वाधिक सण, व्रतवैकल्ये येतात. मुळात हिंदू धर्म हा दुसऱ्या धर्मांचा द्वेष करणारा नाही, तर सर्वांना प्रेमानं आपल्या सोबत घेणारा, सामावून घेणारा आणि सलोखा शिकवणारा आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील गावागावांमध्ये हिंदु सणसमारंभामध्ये सर्व जातीधर्माचे लोक सहभागी होतात. अशी अनेक धार्मिक स्थळं आहेत, जिथं सर्व धर्मीय लोक नतमस्तक होतात. श्रावण महिन्याच्या निमित्तानं आम्ही अशा काही श्रद्धास्थानांची माहिती देत आहोत. आपणही आपल्या गावात, परिसरात असलेल्या अशा श्रद्धास्थानांची, तेथील प्रथापरंपरांची माहिती आम्हाला कळवा. आम्ही त्याला प्रसिद्धी देऊ…

संभूअप्पा आणि बुवाफन यांचा

दर्गा सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान

गेली साडेतीनशे वर्षे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये धार्मिक एकोपा जपणारं एक श्रद्धास्थळ आहे. वारकरी संप्रदायाशी जोडलेलं हे ठिकाण संभूआप्पा आणि बुवाफन दर्गा नावानं ओळखलं जातं. इस्लामपूरचे ग्रामदैवत असलेलं हे ठिकाण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. संभूअप्पा आणि बुवाफन या दोन सत्पुरुषांपैकी फक्त एकाचंच दर्शन घेतलं, तर ते दर्शन अपुरं राहिल्याचं मानलं जातं.

कबीर-कमालांचे अवतार
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी, ज्या काळात समाजात अस्पृश्यता बोकाळली होती, हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेषाची बीजे पेरली जात होती, अशा काळात संभुआप्पा इस्लामपूरमध्ये वास्तव्यास आले. त्यांनी त्यांच्याही आधी ३०० वर्षे होऊन गेलेल्या बुवाफन यांना गुरु मानलं. कारण त्यांना तसा दृष्टांत मिळाला. कोल्हापूरला जाताना वाटेत ते इस्लामपुरात थांबले ते कायमचे इथलेच झाले. हातमागावर कापड विणून ते विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. संभुआप्पा हे लिंगायत कोष्टी समाजातील सत्पुरुष, तर बुवाफन हे संभुआप्पांचे गुरू मुस्लिम समाजातील. वारकरी संप्रदायानं अठरा पगड जाती-जमातींना एकत्र आणलं, तेच कार्य संभूआप्पा-बुवाफन या गुरुशिष्यानं इस्लामपूर परिसरात केलं. ही जोडी कबीर आणि कमाल या गुरुशिष्य जोडीचा अवतार मानली जाते. महाराष्ट्रातील संतांच्या भेटीसाठी संत कबीर काशीहून म्हणजे उत्तर भारतातून पंढरपुरात आले. महाराष्ट्राशी त्यांचे भावबंध जुळले. कबिरांचा मुलगा कमाल यांची समाधीही पंढरपुरात आहे आणि पंढरपूरचे नाते इस्लामपूरशी आहे. बुवा म्हणजे साधू आणि फन म्हणजे फकीर. मानवता धर्माची स्थापना हेच त्यांचे कार्य असते. दोघेही मूळ मालगाव (ता. मिरज) येथील. खरं तर संत महात्म्यांना जात-धर्म नसतो. असतो तो एकच मानवताधर्म. याच धर्माचं पालन उरुण इस्लामपूरचे नागरिक गेली साडेतीनशे वर्षे गुण्यागोविंदानं करीत आहेत. बंधुभाव जपणाऱ्या अनेक प्रथा-परंपराही त्यांनी टिकवल्या आहेत. या शहरात आजतागायत जातीय आपत्ती नाही की, दंगल नाही. तेही केवळ या हिंदू-मुस्लिम एकोप्यामुळंच. इस्लामपूरशेजारी पूर्वी उरुण गाव होतं. या दोन्ही गावांच्या मधोमध उरुणावती देवीचं मंदिर होतं. कालांतरानं ही दोन्ही गावं जोडली जाऊन उरुण-इस्लामपूर हे एकच गाव झालं.


पांडुरंगाचं वास्तव्य इस्लामपुरात
पंढरपूरनंतर पांडुरंगाचं वास्तव्य इस्लामपुरात असतं, अशी इथं श्रद्धा आहे. वैराग्य धारण केलेले संभूआप्पा वाळवा किल्ले तालुक्यातील मच्छिंद्रगडावरील मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊन कोल्हापूरकडे जात असताना वाटेत इस्लामपूरमध्ये थांबले. इथं भेटलेल्या खेलजी पाटील यांच्या मदतीनं संभुआप्पांनी खऱ्या अर्थान इस्लामपूरचं पंढरपूर केलं. हळूहळू लोक त्यांना येऊन भेटू लागले. त्यात सर्वसामान्य भाविक असत. संभुआप्पा त्यांना मानवतेचे विचार सांगत. एकदा त्यांच्याकडं आलेल्या काही लोकांनी गावातले, शेजारपाजारचे लोक पंढरपूरला गेले, पण आम्हाला परिस्थितीमुळं जाता आलं नाही, अशी खंत व्यक्त केली. संभुआप्पा तत्काळ उठले आणि त्या लोकांना जवळच्या भांडारमाळावर घेऊन गेले. तिथं सर्वांना भावसमाधी लागली. त्या अवस्थेतच त्यांना चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठलाचं दर्शन झाल्याची अनुभूती आली. शेजारपाजारचे पंढरपूरला गेलेले लोकही त्यांना त्या अवस्थेत भेटले. हा अनुभव त्यांनी एकमेकांना सांगितला. ही आख्यायिका अजूनही इस्लामपुरात प्रसिद्ध आहे.

पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन
पंढरपूरमधील श्री विठ्ठलाचं दर्शन काही मोजक्याच लोकांना आपण घडवलं. ते सर्वांना घडवायला पाहिजे, या विचारातून त्यांनी पंढरपूरनंतरचा सर्वात मोठा गोपाळकाला इस्लामपुरात सुरू केला. तो उत्सव अजूनही मोठ्या उत्साहानं साजरा होतो. गोपाळकाल्याच्या उत्सवाला वारकऱ्यांमध्ये मोठं महत्त्व आहे. सप्ताह किंवा धार्मिक सोहळ्यानंतर गोपाळकाला होतो. ही कल्पना मूळची श्रीकृष्णाची. कुठलाही भेदाभेद न पाळता सर्व जातीधर्मांच्या सवंगड्यांना एकत्र घेऊन श्रीकृष्ण यमुनेच्या काठावर एकत्रित भोजन करत. परस्परांमधील बंधुभाव दृढ व्हावा, हा त्यामागचा उद्देश. वारकरी आषाढी वारीला जातात तेव्हा वारीच्या शेवटच्या कार्यक्रमात अर्थात गोपाळकाल्यात सहभागी झाल्याशिवाय माघारी येत नाहीत. गोपाळकाल्यात ते एकमेकांना लाह्यांचा प्रसाद भरवितात. हीच परस्परप्रेमाची गोपाळकाल्याची प्रथा मोठ्या दूरदृष्टीनं संभूअप्पांनी इथं सुरू केली.


आषाढी पौर्णिमा, ज्याला आपण गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतो, त्या दिवशी गावातील विविध समाजांच्या दिंड्या भजन करत एकत्र येतात. भांडारमाळात गुरूंचे दर्शन घेतात. सर्व दिंड्या मिळून झालेली मोठी दिंडी उरुण भागाला प्रदक्षिणा घालते. मग त्या ठिकाणी दहीहंडी म्हणजेच वारकरी परंपरेतील एकोप्याचे प्रतीक असणारा गोपाळकाला होतो. आपण पंढरपूरच्या गोपाळपुऱ्यातील गोपाळकाल्यातच सहभागी झाल्याचा आनंद प्रत्येक जण अनुभवतो. यातील विशेष असं की, संभूआप्पांनी सर्व जातीधर्मांचे लोक दिंडीच्या रूपानं एकत्र आणले. यातून त्यांनी माणुसकी जोपासण्याचाच संदेश दिला.

बारा बलुतेदारांना सन्मान
उरसाच्या वेळी या ठिकाणी जो मंडप चढवला जातो, यात बाराही बलुतेदारांना सन्मान दिलेला आहे. हेही चंद्रभागेच्या वाळवंटात जमणाऱ्या वैष्णवांच्या मेळाव्याप्रमाणंच. जुन्या काळातील भेदीक परंपरा इथ आजही जपण्याचा प्रयत्न केला जातो. मठामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. बहुजनांच्या संस्कृतीशी एकजीव झालेली ही एकजिनसी अशी परंपरा आहे. इथला उरूस हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उरूस मानला जातो. पंधरा ते वीस दिवस चालणारा हा उरूस विशेषत्वाने बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. यात्रा काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. कार्तिक पौर्णिमा हा श्री संभूआप्पांचा जन्मदिवस मानला जातो. पौष मास वद्य नवमी शके १६६२ रोजी संभूआप्पांनी जिवंत समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी इरुबाई आणि पुत्र श्री बाबुआप्पा यांनी मठाचा कार्यभार पाहण्यास सुरुवात केली. त्यांच्या काळापासूनच उरूस भरविण्याची प्रथा सुरू झाली.

कार्तिक शुद्ध दशमीस पाच चांदण्या (भाग) असणारा नक्षीदार कापडी मंडप उभारून आणि गूळ (सध्या साखर) वाटून उरुसाला सुरुवात करण्याची प्रथा आजही जोपासली जाते. या वेळी सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र येतात. सर्व जण सन्मानपूर्वक आपली परंपरागत सेवा बजावतात. एकदिलाने मंडप चढवून आनंदोत्सव साजरा करतात. मंडप उभारणीसाठी वापरले जाणारे मोठे लाकडी खांब म्हणजे विविध जातीधर्मांचे प्रतीकच. या वेळेपासून पौर्णिमेपर्यंत मंडपाखालचे रोजे (उपवास) करण्याची प्रथा आजही भाविक मोठ्या श्रद्धेने जपत आहेत. याच दिवशी सायंकाळी मठातील मानाचे समजले जाणारे महंत ‘फकीर’ होतात. तसेच मठाधिपती परिवारातील कुटुंबीयांना ‘फकीर’ केले जाते. पुढे कार्तिक पौर्णिमेपर्यंतचे सलग तीन दिवस लोक श्रद्धेने फकीर होतात. या वेळी त्यांच्या गळ्यात निळ्या रंगाची कफनी आणि हातात गुलाबी दोरा (अटी) बांधला जातो. प्रसाद म्हणून मातीच्या कुंड्यातून भात आणि आवळ्याचे लोणचे दिले जाते. भात शिजविण्याचा मान माळी समाजाला असतो. मठातील विविध धार्मिक विधींचा मान वेगवेगळ्या समाजाला आहे. कार्तिक पौर्णिमेला शहरात सर्व घरांमध्ये किमान पाच फकीर संभूआप्पाचे रूप समजून पुजले जातात. दक्षिणा दिली जाते.”

दोन्ही घुमटांना जोडणारे वस्त्र
संभुआप्पा उरूस हा सर्वसामान्यांचा उत्सव आहे. कार्तिक वद्य प्रतिपदेस मानाचा पहिला गलफ (वस्त्र) शासनाच्या वतीने उरुणमधील पोलीसपाटील घालतात. तुलसी विवाहाच्या दिवशी श्री संभूआप्पा आणि बुवाफन यांच्या दोन्ही घुमटांना एकत्रित जोडणारे वस्त्र (ध्वज) बांधण्याची प्रथा आहे. यात्राकाळात गलफ घालणे, दंडस्नान घालणे, पाच नारळांचे तोरण बांधणे, फकीर पुजणे, मलिदा, पेढे वाटणे याद्वारे यथाशक्ती भक्ती अथवा नवसफेड केली जाते. फकीर करणे किंवा फकीर होणे ही मोठी सन्मानाची बाब असते. उरसावेळी मंडप चढलेल्या दिवशी सायंकाळी ‘फकीर’ करण्याचा कार्यक्रम असतो.

डोंगरे आणि वायचळ तसेच मठकरी यांच्या घराण्यातील लोकांना फकीर केले जाते. तीन दिवस नवसाचे फकीर करणे सुरू असते. फकीर होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकातून लोक येतात. विविध धार्मिक विधींमध्ये माळी, शिंगाडे (चौधरी), पाटील, पवार, चांभार, शिंपी, हरिजन यांना विशिष्ट असा मान आहे. संदल (गंधरात्र) हा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. वर्षातून चार वेळा संदल होते. कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, पौष वद्य नवमी (संभुआप्पा समाधी दिन), अनंत चतुर्दशी ( श्री संभूआप्पा उरुणात प्रथम आले तो दिवस), माघ वद्य एकादशी. प्रत्येक गंधरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी पाकाळणी (समाधी स्थाने आणि परिसर स्वच्छ धुणे) होते. महंत, फकीर, मानकरी उपस्थित असतात. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी मानकरी, ग्रामस्थांना भोजन दिले जाते.

फकीर होणे सन्मानाचे
वळू होणे अर्थात मठामध्ये आठवडाभर स्वयंसेवक होऊन राहणे आणि फकीर होमे सन्मानाचे मानले जाते. ज्यांची इच्छा अथवा नवस पूर्ण झालाय असे लोक पाच दिवस घरी न येता सेवेत वाहून घेतात आणि फकीर होणारे नंतरचे काही दिवस साधूवृत्ती अंगिकारून कार्यरत राहण्याचा संदेश देतात. फकीर करणे, दिवा लावणे, उदी फिरवणे असा मान असलेले श्याम खुळे हे गेली ६० वर्ष पुण्यात स्थायिक आहेत. शासकीय सेवेत आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेचे पाईक आहेत. प्रार्थनेतून मानवकल्याणाचा संदेश देणाऱ्या ‘फात्या देणे’ या विधीचा मान गेली अनेक वर्षं मुबारक मुल्ला आणि बाबू कासम खाटिक यांना आहे. गलेफचा पहिला मान पोलिसपाटलांना असतो. खेलजी पाटील संभूआप्पांचे मित्र होते. त्यांची समाधी आजही आहे. खेलजी पाटील मोठे जमीनदार होते. त्यांनी त्या काळी १०० एकर जमीन मठाला दिली. वतनदार म्हणून आणि पोलिसपाटील म्हणून त्यांच्या वंशजांना मान दिला जातो.

श्री संभुआप्पा मठाची वास्तूरचना
राष्ट्रीय एकात्मता, हिंदू-मुस्लीम ऐक्‍य आणि गुरु-शिष्य परंपरेचे प्रतिक असणारा हा मठ म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. श्री संभुआप्पा-बुवाफन यांच्या समाधीस्थळावरील गोल घुमट, त्यावरील चंद्रकोर आणि चारही कोपऱ्यातील नक्षीदार कोरीव दगडी खांब ऐतिहासिक वास्तुकलेची साक्ष देतात. गुरू बुवाफन यांची समाधी (तुरबत) आणि आतील गाभारा प्रशस्त आहे. मठाचे मुख्य प्रवेशद्वार तसेच दक्षिण आणि पश्‍चिमद्वार आकर्षक आहेत. मठाभोवती दगडी बांधकामातील प्रचंड तटबंदी असून चारही बाजूस भक्कम बुरूज आहेत. मठामध्ये पाण्याचे आड, शुध्द भाव आणि मधुरतेची साक्ष असणारा लिंबाचा पार, श्री संभुआप्पांचे बैठकीचे स्थान, भंडारमाळी, नगारखाना, सोनारसोपा, चांभार सोपा, श्री संभुआप्पांची पत्नी इरुबाई तसेच आजवरच्या मठाधिपतींची समाधीस्थाने, श्री संभुआप्पांचे जीवलग मित्र खेलजी पाटील समाधीस्थळ, पूर्वी भेदीक गाण्यांची प्रथा होती ती समाधीस्थळांमागील जागा, पूर्वी जिथुन कळवाती नाचण्याची प्रथा होती तो तुळशी कट्टा अशी स्थाने आजही सुस्थितीत आहेत.

संभूआप्पांची अन्यत्रही स्थानं आहेत. त्यामध्ये मालगाव (ता. मिरज), शिरोळ, इचलकरंजी, पेठवडगाव, काले तसेच बावासफा आणि संभुआप्पा (ता. कऱ्हाड), बेळगाव, कवलापूर यांचा समावेश आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील लाखो भक्तगण आणि दूर असणारे उरुण-इस्लामपूरवासीय आवर्जून उरसाला येतात, फकीर होतात, तोरण बांधतात आणि ‘संभुआप्पा-बुवाफन का दस्तूर धीन…’ असा गजर करतात, जगाला बंधुभावाचा संदेश देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *