पीएमपीच्या १५० जादा बस,

पाणीपुरवठ्याचेही नियोजन

श्रीक्षेत्र देहू : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा ३७५ बीज सोहळा २७ मार्च रोजी होत आहे. यानिमित्त श्रीक्षेत्र देहू येथे येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांना सुविधा पुरवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.

यात प्रामुख्याने बीज सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, निवारा, वैद्यकीय सेवा, वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्था आदी विविध विभागांनी नियोजन आराखडा तयार करावा. प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नेमून समस्या सोडवाव्यात. देहू नगरपंचायत येथे नियंत्रण कक्ष तयार करून त्वरित अडचणी सोडवाव्यात, अशा सूचना पिंपरी चिंचवड अपर तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिल्या.   जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत कार्यालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बीज सोहळा नियोजन आढावा घेण्यात आली. या वेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, नगराध्यक्षा पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे, विस्तार अधिकारी महेश वाघमारे आदी उपस्थित होते.

यासोबतच देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे अधीक्षक लक्ष्मण तनपुरे, पुणे महानगर परिवहन महामंडळ आगार प्रमुख भास्कर दहातोंडे, वाहतूक विभागाचे चिंतामण जोशी, पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, एलआयबीचे अजित सावंत, संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, जयेश मोरे, मंडल अधिकारी दीपक नरवडे, तलाठी सूर्यकांत काळे, नगरसेवक प्रवीण काळोखे, योगेश परंडवाल, योगेश काळोखे, आदित्य टिळेकर, सचिन कुंभार, प्रदीप परंडवाल, नरगसेविका पूनम काळोखे, सपना मोरे, प्रियंका मोरे आदी उपस्थित होते.
भाविकांसाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन, स्वच्छता, जलसंपदा विभाग, महावितरण विभागाशी पत्रव्यवहार, पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून नदीघाट परिसर, गावातील स्वच्छता, कचरा वाहतुकीचे नियोजन, नदीपात्रातील जलपर्णी काढणे याचे नियोजन केले आहे. चौदा टाळकरी कमान ते गाथामंदिर रस्त्यावर १० सीसीटीव्ही बसवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महावितरण सहायक अभियंता एस. एस. हंचाटे यांनी २४ तास सेवा उपलब्ध असणार असून वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी फीडरवरून वीजपुरवठा करण्यात येईल, गावातील रोहित्रे सुरक्षित करू असे सांगितले. जलसंपदा विभागाने नदीला पाणी दोन टप्प्यात सोडावे, पहिल्या टप्प्यात जलपर्णी वाहून आली तर ती काढण्यास वेळ मिळेल अशी सूचना योगेश परंडवाल यांनी केली.
पुणे महानगर परिवहन विभागाच्या वतीने यात्रा काळात १५० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असून या काळात बसेसचे कोणतेही भाडे वाढवू नये, अशी मागणी संस्थानच्या वतीने करण्यात आली. बस बाह्यवळण मार्गाने जाव्यात. पार्किंग गायरानात करावी, अशी सूचना पोलिसांनी मांडली. संस्थानच्या वतीने पाणीपुरवठा, मंदिर परिसर स्वच्छता, जलपर्णी, पालखी मार्ग मोकळा ठेवणे व स्थानिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मुभा द्यावी या संदर्भात सूचना मांडण्यात आल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *