माईर्स एमआयटी समूहातर्फे

डॉ. वि. दा. कराड यांचा पुढाकार

पुणे : “आपले हात हे घेण्यासाठी नाहीत, तर देण्यासाठीही असतात. याच न्यायानुसार श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणार्‍या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर उभारणीसाठी सर्वांनी उदार अंतःकरणाने मदत करावी”, असे आवाहन ‘माईर्स एमआयटी’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी आज (दि. २ ऑक्टोबर) येथे केले.


जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मितीसाठी माईर्स एमआयटी शिक्षण समूहाच्या वतीने डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते दीड कोटी रुपयांच्या देणगीचा चेक श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.


‘एमआयटी’च्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित कार्यक्रमात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू शिक्षणतज्ञ डॉ. एस. एन. पठाण, डॉ. संजय उपाध्ये, दामोदर शिंदे, माजी सरपंच इंदोरी, बबनराव ढोरे, अरविंद शेवकर, विष्णू खांदवे आणि इक्बालभाई शेख उपस्थित होते.

माईर्स एमआयटी शिक्षण समूह, पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, उज्जैनची एमआयटी अवंतिका युनिव्हर्सिटी आणि शिलॉंग येथील एमआयटी यूटीएमच्या शैक्षणिक संस्थांचे ५४ हजार विद्यार्थी, २५०० शिक्षक आणि ३५०० शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हेे मौलिक योगदान देण्यात आले आहे.


याबाबत बोलताना डॉ. कराड म्हणाले, “या सुवर्णजडित मंदिराच्या माध्यमातून भारताच्या वैभवात भर पडेल. अशा या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि त्याचा अद्भूत इतिहास आपण कर्तव्य भावनेतून जपून ठेवावा. पवित्र धर्म तीर्थक्षेत्रांचा ज्ञानतीर्थ क्षेत्र म्हणून विकास करून भंडारा डोंगराचे वैभवशाली स्वरूप जगासमोर विशेषतः युवा पिढीपुढे आणावा.”

बाळासाहेब काशिद म्हणाले, “भंडारा डोंगर येथे जवळपास १५० कोटी रूपये खर्च करून मंदिर निर्मितीचे कार्य सुरू आहे. त्यात एमआयटी संस्थेकडून मिळालेल्या या निधीचा खूप मोठा वाटा असेल. सृष्टीवरील प्रत्येक मानवाला शांतीची गरज आहे, पण ती त्याला मिळत नाही. परंतू संतांच्या या भूमीत आम्हाला सदैव आनंद आणि शांती मिळते. या डोंगरावरून संपूर्ण जगात शांतीचा मंत्र दिला जात आहे.”

यावेळी डॉ. एस. एन. पठाण म्हणाले, “चारशे वर्षांपूर्वी दुभंगलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे महान कार्य जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांनी केले. ते एक महान समाजसुधारक होते. त्यांनी लिहिलेल्या अभंगानंतर मुस्लिम समाजातील बरेच लोक वारीला जाऊ लागले.”

मंदिर निर्मितीसाठी अखिल भारतीय मुस्लिम बुद्धिजीवी मंचच्या वतीने सव्वा लाख रुपयांची देणगी देण्यात आली. मुस्लिम समाजातील लोकांनी तुकोबारायांच्या मंदिरासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही यावेळी डॉ. पठाण यांनी केले.त्यानंतर डॉ. संजय उपाध्ये यांनी आपले विचार मांडले. डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *