पालखी सोहळा प्रमुखपदी

तीन विश्वस्तांची झाली निवड

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३९व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार दिनांक २८ जून २०२४ रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीला श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी (दि. २४) संस्थानच्या वतीने या सोहळ्याच्या प्रमुखांची निवड जाहीर करण्यात आली.

यंदाचा पालखी सोहळा कडक उन्हाळा आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत आहे. तरीही यंदा पालखी सोहळा नेहमी प्रमाणेच उत्साहात होण्याची शक्यता आहे. यावर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाचे शेवटचे वर्ष आहे. संस्थानच्या पार पडलेल्या बैठकीत यंदा पालखी सोहळा प्रमुख म्हणून माणिक महाराज मोरे, विशाल केशव मोरे आणि संतोष महाराज मोरे यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे.

लोणी काळभोर ते यवत हे सुमारे २० ते २५ किलोमीटर आहे. त्याचप्रमाणे लोणी काळभोर येथे सर्व दिंड्या बारस सोडून निघत असतात. उरुळी कांचन येथे दुपारच्या विश्रांतीच्या पालखी गावात जाण्यायेण्यासाठी दीड-दीड तास लागतो. त्यामुळे तेथून पालखी निघण्यास उशीर लागतो. परिणामी यवत येथील मुक्कामी पोहचण्यासाठी उशीर होतो.

यामुळे उरुळी कांचन येथील ग्रामस्थांना विनंती करून दुपारचा विसावा पालखी मार्गावर म्हणजे महामार्गावर ठेवावा अशी विनंती संस्थानतर्फे केली जाणार आहे. त्याचप्रमाणे लोणी काळभोर येथील मुक्कामही नवीन पालखी तळावर होणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *