रिमझिम पावसामध्ये रंगले

चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण

फलटण : वारीच्या वाटचालीत वारकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला उभ्या रिंगणाचा सोहळा आज (दि. ३०) चांदोबाचा लिंब येथे पार पडला.

रिंगण सोहळा पार पडल्यानंतर सायंकाळी सोहळा तरडगाव येथे विसावला. उद्या सकाळीच (दि. १ जुलै) सोहळा दोन दिवसांच्या फलटण मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.

लोणंद येथील अडीच दिवसांच्या विश्रांतीनंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याची तरडगाव मुक्कामी जाण्याची तयारी सुरू झाली. परंपरेप्रमाणे पहाटे संस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींची महापूजा आणि आरती करण्यात आली. कोकण, आंध्र, कर्नाटकासह सांगली, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणांहून आलेल्या लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले आणि ते सोहळ्यात सहभागी झाले.

फलटण तालुक्यात स्वागत

लोणंद येथील अडीच दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारी एक वाजता श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणासाठी तरडगावकडे मार्गस्थ झाला. व्यापारी पेठ, एस.टी. स्टॅण्ड, अहिल्यादेवी होळकर चौक येथील स्वागत आणि निरोप स्वीकारून सोहळा लोणंद-फलटण मार्गावर आला. दुपारी अडीच वाजता कापडगाव येथे सोहळ्याचे फलटण तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसिलदार समीर यादव ल, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, गटविकास अधिकारी अमित गावडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले.

आल्हाददायक वातावरणात रिंगण सोहळा

दुपारी दीड वाजता आकाशात मेघ दाटून आले आणि काही वेळातच रिमझीम पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने वारकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. या पावसाने वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. उभ्या रिंगणासाठी दुपारी साडेतीन वाजता माऊलींचा आणि स्वाराचा अश्‍व चांदोबाचा लिंब येथे दाखल झाले. सायंकाळी चार वाजता माऊलींचा रथ रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचला. श्री स्वामी समर्थ आर्टच्या रांगोळी कलाकार राजश्री जुन्नरकर यांनी सुंदर अशा रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. पहिलाच रिंगण सोहळा असल्याने लाखो भाविकांनी गर्दी केली होती. चोपदार उध्दव यांनी रिंगण लावून घेतले. सायंकाळी सव्वा चार वाजता रिंगणासाठी अश्‍व सोडण्यात आले आणि दोन्ही अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

सुरुवातीला स्वाराचा मोती हा अश्व पुढे धावला, तर त्यामागे माऊलींचा हिरा हा अश्व धावला. दोन्ही अश्‍वांनी धावत धावत रथाला प्रदक्षिणा मारली. रथाजवळ येऊन अश्‍वांनी माऊलींचे दर्शन घेतले. सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी अश्‍वाला प्रसाद दिला. त्यानंतर माऊलीचा अश्‍व पुढे, तर स्वाराचा अश्‍व त्याच्या मागे धावत सोहळ्याच्या अग्रभागी जावून पोहोचले. बाळासाहेब चोपदार हे रथाजवळ उभे राहिले. त्यांनी चोप उंचावल्यानंतर ‘तुकाराम तुकाराम’ नामाचा जयघोष झाला आणि रिंगण सोहळा पूर्ण झाला.

वारकऱ्यांचे रंगले विविध खेळ

या रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यामध्ये विविध खेळ खेळण्यात आले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने वारकऱ्यांच्या खेळात रंगत आली. ल उभ्या रिंगण सोहळ्याने वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. विविध खेळानंतर सोहळा तरडगावकडे दिशेने निघाला.

पालखी सोहळ्यातील हा पहिला उभ्या रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांसह लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगांव, पर्‍हार खुर्द, हिंगणगांव, राहुडी, माळेवाडी, शिंदेमळा आदी गावांतील हजारो भाविक उपस्थित झाले होते.

लोणंद ते तरडगाव या वाटचालीत ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी आणि भाविकांनी माऊलींसह सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले. तरडगाव येथे नव्याने तयार केलेल्या विस्तीर्ण अशा पालखी तळावर सायंकाळी सहा वाजता हा सोहळा पोहोचला. समाज आरती नंतर सोहळा तेथे मुक्कामासाठी विसावला. येथे सोहळ्याचा एक दिवस मुक्काम असून उद्या (दि. १ जुलै) हा सोहळा दोन दिवसांच्या फलटण मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *